बुधवार, २५ नोव्हेंबर, २०१५

कलीयुगामध्‍ये जीवास सन्‍मार्ग दाखि‍वणारे व उध्‍दार करणारे फक्‍त संत महात्‍मेच आहेत.''संतावीण प्राप्‍ती नाही । ऐसे वेद देती ग्‍वाही ॥'' परंतु या जगात संत असणारे वेगळे व दिसणारे वेगळे. यामुळे अनेक भाविक जीवांची दिशाभूल होऊन ते चाचपडताना दिसतात. मात्र भाग्‍य उदयाला आल्‍यावर संतांची भेट होते. त्‍याप्रमाणे संत सच्चिदानंद श्रीपाद बाबा व रामदास बाबा या महात्‍म्‍यांची भेट होऊन ख-या संतांची ओळख झाली. कलियुगात अवडंबर करणारे खुपच आहेत. परंतु ख-या संताची भेट झाल्‍यानंतर सुरवातीलाच काही शंका उपस्थीत झाल्‍या, त्‍या नमुद करणे आवश्यक वाटते. ज्‍यावेळेस संताना पाहिले त्‍यावेळेस जगत नियमानुसार संत इतके साधे असू शकतात का? हिच पहिली शंका सर्वांसमोर आहे. दुसरी यांच्‍याकडे गुहय असे ज्ञान आहे म्‍हणतात मग ते शिष्‍यास कसोटी लावल्‍या शिवाय गुहयज्ञान कां देतात? व तिसरी शंका म्‍हणजे त्‍यांची गुरुदक्षिणा कांय असेल? वगैरे पण संत हे काहीही जाणून न देता या सर्वांचे निरसन करतात. हे दोन्‍ही महात्मे साधेपणाने जगात राहून उच्च तत्‍वज्ञानाचा बोध करीत हे त्‍यांचे जवळ गेल्‍यानंतरच कळले, शिवाय ज्‍यावेळेस त्‍यांच्‍या वाणीतून अमृतानुभवाचे विवेचन ऐकले तेंव्‍हा त्‍यांचा अधिकार समजला. शिवाय संताच्‍या प्रमाणां प्रमाणे कोणाकडून कसलीच अपेक्षा न ठेवता कोणतीही परिक्षा न घेता मुक्‍त हस्‍ताने हे ते ज्ञान देतात. ''सकळांशी येथे आहे अधिकार । कलीयुगी उध्‍दार हरीच्‍या नामे॥' हे त्‍यांच्‍या सहवासात आल्‍यानंतरच कळले व निर्धार पक्‍का झाला की, ''ऐशी कळवळयाची जाती । करी लाभाविण प्रिती ॥'' याचा यथार्थ अनुभव अनेकांना आला.
   नाशिक परिसरातच नव्‍हे तर इतरही ठिकाणी महात्म्यांच्या संगतीमध्‍ये 'निस्‍वार्थता' 'अनासक्‍ती' व 'निष्‍पृहता' अनुभवाला आली. कार्यक्रम झाल्यानंतर काही लोक बाबांना नारळ सुद्धा देत नव्हते तरी आनंदाने सर्वांचा निरोप घेऊन बाबा पुढील धर्मकार्यासाठी निघुन जात. शिवाय दुसरी गोष्ट अशी की धर्मप्रचार करताना अगदी परखड भाषेत कोणाचीही भिडभाड न ठेवता स्पष्टपणे करत.''नाही भीड भाड । तुका म्‍हणे साना थोर॥'' पुराव्यानिशी निव्वळ किर्तन प्रवचनच नव्‍हे तर संगती मधूनही परमार्थ समजावुन सांगुत. मात्र संताचे रितीमध्‍ये कुठलाही बदल न करता उपदेश करत, त्याची अंमलबजावणी कशी करावी हे स्पष्ट करता करता उपदेशाची कृती करुन घेऊन त्याची गरज कां? या एकाच शब्दात त्‍यांनी फैसला सांगीतला की, ''एक नाम तारी । बाकी सब दुकानदारी'' करारे बापानो साधन हरीचे । झणी करणीचे करु नका''आणि कुठपर्यंत करायचे तर पायाचे अंगठे बांधत नाहीत तो पर्यंत करायचे. सर्व सामान्यांनाही सहजतेने करता येणा-या नामाचा विषय समजावुन दिला. योगमार्गाचा किंवा अवघड मार्गाचा अवलंब न करता सहज सुलभ रितीने करवुन घेतले. महत्वाचे म्हणजे त्याची अंमलबजावणी कशी होते ह्याबाबत जागरुक राहून ते सदैव कसे होईल ह्याकडे नेहमी त्‍यांचा कटाक्ष असे. लौकिक व प्रसिद्धी याकडे दुर्लक्ष करुन समबुद्धीने धर्म कार्य करण्‍याची रित अर्जुनासारख्‍या साधकांमध्‍ये ठसवीली. ''अर्जुना समत्‍व चित्‍ताचे । तेची सार जाण योगाचे । तेथ मन आणि बुध्‍दीचे ऐक्‍य आधी ॥''     
   एकदा बाबांसोबत आम्ही सर्वजण बसलो असताना बाबा इतर कांही न बोलता फक्त परमार्थच सांगत होते. तेव्‍हा त्यांनी आमच्या दोघांचे हात हातात घेतले व म्हणाले “तू सांग डॉक्टर आहेस ना, मग तू या ताईच्या कातड्यावर प्रेम करतोस की ताईवर? हे कातडे जर काढुन घेतले तर तु तीच्यावर प्रेम करशील का?” मनुष्य फक्त नाशिवंतावर प्रेम करतो, शाश्वतावर प्रेम करित नाही. ''तुका म्‍हणे कारे नाशीवंता साठी । देवासवे तुटी पाडीतोशी'' बाबांनी बोलताना म्हणावं मी देहुला गेलो होतो. किर्तनासाठी उभा राहीलो तर एक बोर्ड बघितला '‘स्त्रीयांना किर्तनाचा अधिकार नाही’'.मग मी म्हटलो तुमच्यामध्ये आत्मा आहे आणि स्त्रीमध्ये आत्मी आहे का? अरे ''एक हरी आत्मा जीव शिव स'' असे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले पायलीचे पन्नास आहेत. 'परमार्थ कोणी सांगावा? जाणत्याने का नेणत्याने' असे नेणते जे कोणी आहेत ते या व्यासपीठावर उभे राहतात व मार्गदर्शन करतात. असे हे बेअब्रुच्यांकडुन काय परमार्थ ऐकावा. “आप डूबे तो डूबे और यजमान कु भी ले डूबे”

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा