शनिवार, २८ नोव्हेंबर, २०१५

सद्गुरुंची उपमा कशालाच देता येत नाही -

सर्वांनी वेळ काढून नक्कीच वाचा

"ज्याने सद्गुरु नाही केला  |
       त्याचा जन्म वाया गेला ||"

सद्गुरुंची उपमा कशालाच देता येत नाही  :-

1. सूर्य प्रकाशाने अंधार पळुन जातो, त्याचप्रमाणे सद्गुरुंचा अभयहस्त ज्याच्या मस्तकावर राहतो त्यांचीकृपा ज्याच्यावर होते, त्याचेवरील मायेचा अंमल नष्ट होतो. ही उपमा इथे लागू पडत नाही. कारण सूर्यास्त होऊन त्याचा प्रकाश लोप पावतो की, रात्र होते व पुन्हा अंधार ब्रम्हांडात भरतो. मात्र सद्गुरूंचे तसे नाही. ते अज्ञानाला मूळासकटच उपटून टाकतात.

2. सोने खराब झाले तरी त्याचे लोखंड कधीच होत नाही. सद्गुरुंच्या दासाचे मन इतके शुद्ध असते की त्यात संशय कधीच उत्पन्न होत नाही.

3. परिस लोखंडाचे सोने करतो पण ते सोने दुसर्‍या लोखंडाला लावले तर, त्याचे सोने होत नाही म्हणजे परिस लोखंडाला परिसपण देत नाही, पण सद्गुरुंला शरण गेलेला शिष्य पुष्कळ लोकांना उपदेश करुन तारतो. म्हणजेच शिष्याला गुरुपद प्राप्त होते. म्हणूनच परिसाची उपमाही सद्गुरुंला लागू पडत नाही.

4. सद्गुरु सागरा सारखा म्हणावे तर योग्य नाही, कारण सागराचे पाणी खारट असते. अगदी क्षीरसागर जरी घेतला तरी तो कल्पांती नासतोच म्हणून ही उपमा तोकडी पडते.

5. सद्गुरु मेरुपर्वतासारखा आहे. असे म्हणावे तर ते योयोग्य नव्हे, मेरु पर्वत अचेतन आहे. कठोर दगड आहे पण सद्गुरू तसे नाहीत. ते सचेतन आहेत, त्यांचे अंतःकरण कोमल आहे म्हणून ही उपमा येथे लागू पडत नाही.

6. सद्गुरु गगनासारखा आहे म्हणावे तर तेही बरोबर नाही. आकाश केवळ शून्य दिसते पण सद्गुरु शून्यापलीकडील स्वरुप आहे. म्हणून ही उपमा सुद्धा उणी पडते.

7. सद्गुरु पृथ्वीसारखा, निश्चल, निर्भय व गंभीर आहे म्हणावे तर ते अवाजवी आहे, कारण पृथ्वी कल्पांत समयी विरुन जाईल पण सद्गुरुला मात्र मर्यादा नाहीत. ते अभंग आहेत.

8. सद्गुरु सूर्यासारखे आहेत म्हणावे तर ते योग्य नाही, बरोबर नाही सूर्याचा प्रकाश किती ?  सद्गुरूंचा प्रकाश अखंड तेवणारा आहे म्हणून ही उपमा अ वास्तव आहे.

9. शेषाची उपमा द्यावी म्हटले तर तो डोक्यावर ओझे वाहतो. म्हणून ही उपमा उणी पडते कारण सद्गुरु कोणतेच ओझे वाहत नाहीत.

10. सद्गुरु पाण्यासारखे आहे म्हणावे तर पाणी सगळे आटून जाते. परंतु सद्गुरु स्वरुप निश्चल असून ते कधीच नाश पावत नाहीत. म्हणून ही उपमा थीटी पडते.

11. सद्गुरु अमृता सारखे आहे असे म्हणावे तर ते योग्य नाही. स्वर्गात राहून नित्य अमृत प्राशन करणारे देव अखेर मृत्युच्याच मार्गाने जातात. ते फक्त नावाचेच अमर असतात पण सद्गुरु ज्यांच्यावर कृपा करतात ते खर्या अर्थाने अमर बनतात म्हणून ही उपमा उणी पडते.

12. सद्गुरु कल्पतरुसारखा आहे म्हणावे तर ते योग्य नाही. आपण जेवढी कल्पना करु तेवढेच कल्पतरू आपणास देतो. परंतु सर्व मानवी कल्पनांच्या पलीकडे असणाऱ्या सद्गुरु पुढे कल्पतरुची किंमत राहत नाही. किंबहुना सर्व कल्पना ओलांडूनच सद्गुरुंजवळ जावे लागते म्हणून ही उपमा उणी आहे.

13. सद्गुरु चिंतामणी सारखा आहे म्हणावे तर ते योग्य नाही. ज्याचे मनात चिंता आहे त्याला चिंतामणीचे महत्त्व वाटते. सद्गुरु शिष्यांचे मनात कसलीच चिंता उरु देत नाही. त्याला काही इच्छाच शिल्लक उरली नाही तो कामधेनूची धार काढायला जाणार नाही म्हणून ही उपमा लागू पडत नाही.

14. सद्गुरुला श्रीमंत म्हणावे तर ते योग्य नाही. कारण जगातील सर्व संपत्ती नाशवंत असते पण सद्गुरुंच्या द्वाराशी अविनाशी मोक्षलक्ष्मी तिष्ठत असते.

15. स्वर्गलोक, इन्द्रपद आणि त्यांचे ऐश्वर्य ही सगळी कालांतराने नाश पावतात पण सद्गुरुंच्या कृपेची प्राप्ती झाली की, ती कोणत्याही काळी नाश पावत नाही म्हणून ही उपमा लागू पडत नाही.

✨ एका सद्गुरुचे स्थान सदैव अविनाशी असते  सगळी सृष्टी नाशवंत असल्यामूळे दृष्य विश्वातील कोणत्याही वस्तुंची उपमा सद्गुरुला त्यांच्या शाश्वत स्वरुपामुळे देता येत नाही. पंचमहाभूतांची उठाठेव सद्गुरु स्वरुपात नाही.

✨  वरील सर्व उदाहरणांवरुन असे दिसून येते की, वर्णन करता येत नाही हेच सद्गुरुंचे वर्णन  !!!

✨ सद्गुरुंचे वर्णन करता न येणे हेच त्यांचे वर्णन समजावे. सद्गुरु स्वरुपाचा अनुभव आतील अनुभव आहे जे स्वतः अंतर्यामी स्थिर झाले आहेत, त्यांनाच या अवस्थेच्या खुणा कळतात. फक्त अंतर्निष्ठानाच कळेल.

✨ श्री सद्गुरु ब्रम्हज्ञानी पुरुष असतात. ते परमात्म्याशी अभिन्न असतात. ते चालते बोलते ब्रम्हच समजावे. ते स्वरुपभूत असल्याने त्यांचे वर्णन कसे करणार ?

✨ परमात्म वस्तू अतिंद्रिय व अचिंत्य आहे. अदृष्य व अलक्षण आहे. अतीगूढ व दुर्लभ आहे. सद्गुरुंच्या कृपेने शिष्य ती वस्तू तद्रूपतेने अनुभवतो. आपला आत्मस्वरुपाचा ठेवा सद्गुरुवाचून मिळत नाही म्हणून सद्गुरु करावा. सद्गुरुंनी कृपा केल्याखेरीज ब्रम्हज्ञान होणे दुरापास्त.

✨ आत्मज्ञान करुन न घेता मनुष्य जी कर्मे करतो ती अज्ञानातून होत असल्याने पुन्हा जन्म घेण्याचे कारण घडते म्हणून ज्ञान घेण्यासाठी सद्गुरुंचे चरण घट्ट धरावे. त्यांना शरण जाऊन ज्ञान देण्याची प्रार्थना करावी.

✨ सद्गुरुंच्या कृपेखेरीज गर्भवास चुकत नाही. नरकात जाणे सुटत नाही. सद्गुरू कृपा करतात म्हणजे काय करतात ? सद्गुरू जीवाला ईश्वर केंद्रित करतात. जीवाची तळमळ शांत करतात. ईश्वरदर्शन घडवितात.

✨  सद्गुरु केला नाही तर जन्म वाया जातो. सद्गुरु पाठीशी नसेल तर जीवन दुःखमय बनते. अभय देणारा हात सद्गुरुंनी डोक्यावर ठेवला तर प्रत्यक्ष ईश्वर प्रकट होतो. संसाराची दुःखे नाहीशी होतात. असे हे सद्गुरुंचे महात्म्य अपरंपार आहे.

टीप :-
जे जे आपणासी ठावे | ते ते सर्वांसी सांगावे ||
शहाणे करुन सोडावे | सकल जन ||
......
वरील श्रीज्ञानेश्वर माऊलींच्या उपदेशानुसार ही ज्ञानगंगा अखंड प्रवाही व्हावी,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा