श्री स्वामी समर्थ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
श्री स्वामी समर्थ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २३ मे, २०१६

●|| सेवा कुलदेवीची ||●

❗श्री स्वामी समर्थ❗

●|| सेवा कुलदेवीची ||●

भारतीय संस्कृतिप्रमाणे कुलदेवतेचे स्थान सर्वोच्च आहे.

प्रत्येक कुळाची रक्षणकर्ता अशी एक कुलदेवता असते. त्या कुळाच्या सम्पूर्ण पालन-पोषणाची व संरक्षणाची जबाबदारी त्या देवतेवर असते.

पण त्या प्रमाणात तिची सेवा उपासना होने आवश्यक आहे.

●कुलदेवता कशी ओळखावी सेवा कशी करावी याची माहिती दींडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्रात दिली जाते.
♀कूलदेवतेची सेवा :-

१)नित्य सेवा :- कुलस्त्री ने मंगलवार/शुक्रवार उपवास रोज सप्तशती अध्याय १/२ अध्याय, नवार्ण मंत्र १ माळ्, श्री सूक्त.

२) विशेष सेवा:- चैत्र व अश्विन नवरात्रात अष्टमीपर्यन्त १४ पाठ सप्तशती ग्रंथाचे करावे. (भाग बांधनी, मूळ स्थानावर सन्मान, कुंकू मार्जन, नवचंडी विधी )

■ भाग बांधनी ■

कुलदेवीच्या वाराच्या दिवशी कुलस्त्री ने सकाळी ११ च्या आत देवपूजा अग्निसाक्षिणे पुढील कृती करावी,

देवहार्या समोर एक शुभ्र नव वस्त्र अंथरून त्यावर सव्वा रूपये, हळद-कुंकू च्या छोट्या पुड्या, अक्षतेची पूड़ी, ठेवणे वरील सर्व हातात घेऊन,
कुलदेवतेची मनोभावे प्रार्थना करावी.

आम्हाला मार्गदर्शन नसल्याने तुमची सेवा आमच्या कडून घडली नाही, आता त्या बाबत तू आम्हाला मार्गदर्शन कर, आमची कार्य मार्गी लागल्यावर आम्ही जोडीने तुझ्या मूळ स्थानावर येऊन तुझा सन्मान करू अशी प्रार्थना करावी.

नंतर त्या वस्त्राचे गाठोडे बांधून प्लायस्टिक अथवा पितळीच्या डबित ठेवावे.

त्या डबिला रोज हळद कुंकू वहावे, कार्य झाल्यावर मूळ स्थानावर घेऊन जाने आणि तेथेच सोडून येणे.

★मूळ स्थानावर सन्मान :-

शक्यतो दरवर्षी, प्रत्येक कुटुंबाने आपल्या कुलदेवतेचा सन्मान करावा. आधी घरी १४ पाठ करावे.

नंतर हिरवी ९ वार साडी १|मी. खन,सोन्याचे मणी-मंगलसूत्र,खेळना-पाळणा, जोडवेविरोदे,पंचखाद्य,बांगड्या, हळद-कुंकू,हारवेनि, फळ दक्षीणा, इ. वस्तु घेऊन जाऊन अर्पण करुण सन्मान करावा. पुरनाचा नैवद्य दाखवावा.

२१ पुरनाचे दिवे लाऊन आरती करावी. आरतीतील पुरण फ़क्त घरच्या च लोकांनी प्रसाद म्हणून घ्यावे.

घरचा टाक/प्रतिमा देव भेट करण्यास नेणे. पूजा झाल्यावर सरळ आपल्या घरी च येणे इतरत्र कुठल्याही तीर्थक्षेत्री /नातेवाइक कुठे च जाऊ नये.

घरी आल्यावर १ सुवासिनी, १ कुमारिका यांना भोजन देऊन विडा(विडयाच्या पानावर १ रूपये व सुपारी) देने.

बरोबर नेलेल्या घरच्या देवीला मंगलवार/शुक्रवार पाहुन पुरनाचा नैवद्य देवून यात्रा ची सांगता करावी.

★ कुंकू मार्चन विधि ★

३०० ग्राम हलकुण्ड विकत आणून दळुन घेणे त्यात चुना(लाल रंग येइपर्यन्त) घालावा.
व लिम्बु पीळावे. या प्रमाणे करुण मिश्रण सावलीत वाळवावे.

त्याचे कुंकू तयार होते. प्रथम सप्तशती रोज १ याप्रमाने १३ पाठ वाचने.

१४ व्या पाठच्या वेळी वाचतांना प्रत्येक ओवी नंतर नमः म्हणून पाच ही बोटांनी फोटो वर अथवा टाका वर कुंकू वहावे.

सदरच्या कुंकू मधे १ मोरपिस जाळून त्याची रक्षा त्यात मिसळावी, व रोज कुलस्त्री ने सकाळी आपल्या कपाळा वर लावावे.

●नवचंडी विधि ●

सर्वांना माहीत च असेल. अधिक माहितीसाठी जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात संपर्क करने.

(सदरची माहिती प.पु.गुरुवर्य गुरुमाऊलींच्या अमृतमय ज्ञानगंगेतुन)

गुरुचरित्र (किंवा सप्तशती) स्त्रियांनी वाचावे का? .

गुरुचरित्र (किंवा सप्तशती) स्त्रियांनी वाचावे का?
.
त्याचे यथामती माझे उत्तर असे राहील.
.
गुरु चरित्रामध्ये पस्तिसाव्या अध्यायात सांगितले आहे की,
स्त्रिया केवी मंत्रहीन । शुक्राचार्या कैसे झाले ॥८॥
विस्तारोनि आम्हासी । सांगा स्वामी कृपेसी ।
म्हणोनि लागली चरणासी । करुणावचनेकरोनिया ॥९॥
श्रीगुरु सांगती तियेसी । पूर्वकथा आहे ऐसी ।
.
आणि पुढे शुक्राचार्य, दमयंती आणि बृहस्पती पुत्र कच याची मंत्र षटकर्णी कसा केला ही गोष्ट आली आहे.
.
श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे. स्त्रींयानी गुरूचरीत्राचे पारायण करू नये असे म्हणतात. पारायणासाठी ज्या गोष्टींचे पालन करायला लागते त्याचे पालनात स्त्रीधर्मामुळे खंड पडण्याची शक्यता असते. संकल्प-पूर्तीसाठी श्रीगुरुचरित्र-वाचनाची विवक्षित पद्धती आहे.
.
पण एक सांगा, जे करू नये तेच का आपल्याला करायचे असते. स्त्रियांनी स्त्रीधर्म पाळावा, पुरुषांनी पुरुष धर्म पाळावा, ते सोडून भलतीकडेच विषय नेण्याची सवय मात्र चांगली नव्हे. स्त्रियांवर मौंजी बंधन संस्कार, शास्त्राध्ययन अधिकार प्राप्ती झालेली नसते. त्यांच्या शरीरात असलेल्या अंड कोशाला बीज मंत्रांनी, मंत्राच्या सामर्थ्याने, उच्चारवाने आघात होवू शकतो.
.
स्त्रियांना मंत्राधिकार नसतात, संध्यावन्दनाचा अधिकार नसतो, मग संकल्प कसा सोडणार. यापूर्वी मी एकदा गुरुचरित्र वाचण्यापूर्वी सोडण्याचा संकल्प पोस्ट केला होता, तो वाचला की आपल्याला कळेल.
.
त्यांनी गुरुचरित्र ऐकावे, वाचू नये. तसेच सप्तशती देखील वाचू नये. शिवाय गुरुचरित्रातले काही अध्याय (२६ वेदरचना, ३६ कर्ममार्ग) हे अध्याय त्यांनी ऐकू देखील नये. त्यात काही बंध, मुद्रा, वैदिक बीजमंत्र आलेले आहेत.
.
स्त्रियांना बीजात्मक मंत्र सिद्ध करण्याचे अधिकार आणि सामर्थ्य नसते. पूर्वीच्या वैदिक स्त्रियांचे दाखले आजच्या कलियुगात चालत नाही, त्यांनी स्वत:ला सिद्ध केले होते. वैदिक काळात गार्गी, मैत्रेयी आदी स्त्रियांनी शास्त्रार्थामधील चर्चेत पुरुषांना देखील लाजविले होते. अध्ययन, सहशीक्षा या गोष्टीला वैदिक काळात प्रोत्साहन दिले जाण्याचेच हे दाखले आहेत.
.
हरित संहिताच्या अनुसार महिला दोन प्रकारच्या असतात, ब्रह्मवादिनी आणि सद्योवाह. यातल्या ब्रह्मवादिनी प्रकारच्या स्त्रियांनी शास्त्रानुसार सारे संस्कार काराबून त्या वेदाध्ययन करण्यास पत्र होत्या, त्या आजन्म ब्रह्मचारिणी राहिल्या होत्या. सद्योवाह स्त्रिया या गृहस्थाश्रमात राहून अनुरूप कर्मे करत होत्या. विशेष म्हणजे ब्रह्मवादिनी स्त्रियां शाम्भावोपाय दिक्षाधिकारी या पात्रतेतील होत्या. काव्य रचना, त्याग, त[अस्य द्वारा त्यांनी ऋषी भाव प्राप्त केलेला होता. त्यांना मंत्राचा साक्षात्कार झालेला होता.
.
त्यांनी ऋग्वेदातील अनेक सुक्त सिद्ध केले होते, साक्षात्कृत केले होते. उदाहरणार्थ,
ऋग्वेद दशम मंडळातले ३९, ४० वे सुक्त तपस्विनी ब्रह्मवादिनी घोषा यांचे आहे.
ऋग्वेदातील १.२७.७ वा मंत्र ऋषिका रोमशा यांचा आहे.
१.५.२९ वा मंत्र ऋषिका विश्वारा यांचा आहे.
१.१०.४५ व मंत्र दृष्टा इंद्राणी यांचा आहे.
१.१०१५९ व मंत्र ऋषिका अपाला यांचा आहे.
तसेच सूर्या नावाची देखील एक ब्रह्मवादिनी ऋषिका होती.
अगस्त्य ऋषी पत्नी लोपामुद्रा सती यांनी देखील आपल्या पती बरोबर सूक्तांचे दर्शन केले होते.
.
या वैदिक काळातील स्त्रियांनी यज्ञोपवीत संस्कार केले होते, त्या वेद, उपनिषद जनात होत्या. शास्त्रोक्त संध्या वंदनादी विधी करून त्या त्या देवता प्रसन्न करवून घेतल्या होत्या. जेव्हा हवे तेव्हा या स्त्रिया हव्या त्या देवतांना आवाहन करीत आणि देवता देखील क्षणाचाही विलंब न करता त्यांच्या सेवेत तत्पर असत, एवढा अधिकार त्यांनी मिळवला होता.

वेद काळातील अदिती, उषा, इंद्राणी, इला, सिनीवाली, प्रश्नि या सुप्रसिद्ध देवस्त्री, ब्रह्मर्षी, ऋषिका होत्या. यात अदिती या नावाचा उल्लेख सर्वाधिक झालेला आहे. या साऱ्या सर्वशक्तीमती, विश्वहितैषीणी तथा मंगलकारिणी देवी मानल्या गेल्या. यांच्या शिवाय दिति, सीता, सूर्या, वाक, सरस्वती यांचे देखील स्तवन होते.
.
निष्कर्ष: जर आजच्या काळात या अधिकारापर्यंत पोचण्याची क्षमता आणि शास्त्रसंमत विधिवत ज्ञानपिपासा असलेल्या अधिकारी स्त्रियांनी वेदशास्त्र अध्ययन करण्यास, गुरुचरित्र वाचण्यास, सप्तशती वाचण्यास काहीच हरकत नाही.
.
.
अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त.⁠⁠⁠⁠
श्री. विष्णुजी राऊत, पुणे
श्री. श्रीकृष्ण पुराणिक

अध्याय १० ते १२ - श्री स्वामी चरित्र सारामृत

अध्याय १०
। श्री स्वामी चरित्र सारामृत दशमोध्याय ।

॥ श्री गणेशाय नमः ॥ गाठी होते पूर्वपुण्य । म्हणूनी पावलो नरजन्म । याचे सार्थक उत्तम । करणे उचित आपणा ॥१॥ ऐसा मनी करुनी विचार । आरंभिले स्वामीचरित्र । ते शेवटासी नेणार । स्वामी समर्थ असती पै ॥२॥ हावेरी नामक ग्रामी । यजुर्वेदी गृहस्थाश्रमी । बाळाप्पा नामे द्विज कोणी । राहते होते आनंदे ॥३॥ संपत्ती आणि संतती । अनुकूल सर्व तयांप्रती । सावकारी सराफी करिती । जनी वागती प्रतिष्ठित ॥४॥ तीस वर्षांचे वय झाले । संसाराते उबगले । सद़्गुरुसेवेचे दिवस आले । मती पालटली तयांची ॥५॥ लटिका अवघा संसार । यामाजी नाही सार । परलोकी दारा पुत्र । कोणी नये कामाते ॥६॥ इहलोकी जे जे करावे । परलोकी त्याचे फळ भोगावे । दुष्कर्माने दुःख भोगावे । सत्कर्मे सौख्य पाविजे ॥७॥ बाळाप्पाचे मनात । यापरी विचार येत । सदा उद्विग्न चित्त । व्यवहारी सौख्य वाटेना ॥८॥ लल्ल संसारी वर्तती । तरी मनी नाही शांती । योग्य सद़्गुरु आपणाप्रती । कोठे आता भेटेल ॥९॥ हाचि विचार रात्रंदिन । चित्ताचे न होय समाधान । तयांप्रती सुस्वप्न । तीन रात्री एक पडे ॥१०॥ पंचपक्वान्ने सुवर्ण ताटी । भरोनी आपणापुढे येती । पाहोनिया ऐशा गोष्टी । उल्हासले मानस ॥११॥ तात्काळ केला निर्धार । सोडावे सर्व घरदार । मायापाश दृढतर । विवेकशस्त्रे तोडावा ॥१२॥ सोलापुरी काम आम्हांसी । ऐसे सांगून सर्वत्रांसी । निघाले सद़्गुरु शोधासी । घरदार सोडिले ॥१३॥ मुरगोड ग्राम प्रख्यात । तेथे आले फिरत फिरत । जेथे चिदंबर दिक्षीत । महापुरुष जन्मले ॥१४॥ ते ईश्वरी अवतार । लोकां दाविले चमत्कार । तयांचा महिमा अपार । वर्णू केवि अल्प मती ॥१५॥ स्वामीचरित्र वर्णितां । चिदंबर दिक्षीतांची कथा । आठवली ते वर्णिता । सर्व दोष हरतील ॥१६॥ महायात्रा संकल्पेकरुन । जन निघती घराहून । परी मार्गी लागल्या पुण्यस्थान । स्नानदान करिताती ॥१७॥ महायात्रा स्वामीचरित्र । ग्रेथ क्रमिता मी किंकर । मार्गी लागले अति पवित्र । चिदंबराचे पुण्यस्थान ॥१८॥ तयांचे घेउनी दर्शन । पुढे करावे मार्गक्रमण । श्रोती होउनी सावधान । श्रवणी सादर असावे ॥१९॥ मुरगोडी मल्हार दीक्षित । वेदशास्त्री पारंगत । धर्मकर्मी सदारत । ईश्वरभक्त तैसाची ॥२०॥ जयांची ख्याती सर्वत्र । विद्याधनाचे माहेर । अलिप्तपणे संसार । करोनी काळ क्रमिताती ॥२१॥ परी तया नाही संतती । म्हणोनिया उद्विग्न चित्ती । मग शिवाराधना करिती । कामना चित्ती धरोनी ॥२२॥ द्वादश वर्षे अनुष्ठान । केले शंकराचे पूजन । सदाशिव प्रसन्न होऊन । वर देत तयांसी ॥२३॥ तुझी भक्ती पाहोन । संतुष्ट झाले माझे मन । मीच तुझा पुत्र होईन । भरवसा पूर्ण असावा ॥२४॥ ऐकोनिया वरासी । आनंदले मानसी । वार्ता सांगता कांतेसी । तीही चित्ती तोषली ॥२५॥ तियेसी झाले गर्भधारण । आनंदले उभयतांचे मन । जो साक्षात उमारमण । तिच्या उदरी राहिला ॥२६॥ अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी । इच्छामात्र घडी मोडी । तो परमात्मा त्रिपुरारी । गर्भवास भोगीत ॥२७॥ नवमास भरता पूर्ण । कांता प्रसवली पुत्ररत्न । मल्हार दीक्षिते आनंदोन । संस्कार केले यथाविधी ॥२८॥ चिदंबर नामाभिधान । ठेवियले तयालागून । शुक्ल पक्षीय शशिसमान । बाळ वाढू लागले ॥२९॥ प्रत्यक्ष शंकर अवतरला । करु लागला बाललीला । पाहोनी जनी-जनकाला । कौतुक अत्यंत वाटतसे ॥३०॥ पुढे केले मौजीबंधन । वेदशास्त्री झाले निपुण । निघंट शिक्षा व्याकरण । काव्यग्रंथ पढविले ॥३१॥ एकदा यजमानाचे घरी । व्रत होते गजगौरी । चिदंबर तया अवसरी । पुजेलागी आणिले ॥३२॥ मृत्तिकेचा गज करोन । पूजा करिती यजमान । यथाविधी सर्व पूजन । दीक्षित त्यांसी सांगती ॥३३॥ प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता । गजासी प्राण येउनी तत्त्वता । चालू लागला हे पाहता । विस्मित झाले यजमान ॥३४॥ बाळपणी ऐशी कृति । पाहोनी सर्व आश्चर्य करिती । हे ईश्वर अवतार म्हणती । सर्वत्र ख्याती पसरली ॥३५॥ ऐशी लीला अपार । दाखविती चिदंबर । प्रत्यक्ष जे का शंकर । जगदुद्धारार्थ अवतरले ॥३६॥ असो पुढे प्रौढपणी । यज्ञ केला दीक्षितांनी । सर्व सामग्री मिळवूनी । द्रव्य बहुत खर्चिले ॥३७॥ तया समयी एके दिनी । ब्राह्मण बैसले भोजनी । तूप गेले सरोनी । दीक्षिताते समजले ॥३८॥ जले भरले होते घट । तयांसी लाविता अमृतहस्त । ते घृत झाले समस्त । आश्चर्य करिती सर्व जन ॥३९॥ तेव्हा पुणे शहरामाजी । पेशवे होते रावबाजी । एके समयी ते सहजी । दर्शनाते पातले ॥४०॥ अन्यायाने राज्य करीत । दुसऱ्यांचे द्रव्य हरीत । यामुळे जन झाले त्रस्त । दाद त्यांची लागेना ॥४१॥ तयांनी हे ऐकोन । मुरगोडी आले धावोन । म्हणती दीक्षितांसी सांगून । दाद आपुली लावावी ॥४२॥ रावबाजीसी वृत्तान्त । कर्णोपकर्णी झाला श्रुत । म्हणती जे सांगतील दिक्षीत । ते अमान्य करवेना ॥४३॥ मग दीक्षितांसी निरोप पाठविला । आम्ही येतो दर्शनाला । परी आपण आम्हांला । त्वरीत निरोप देईजे ॥४४॥ ऐसे सांगता दीक्षितांप्रती । तये वेळी काय बोलती । आता पालटली तुझी मती । त्वरीत मागसी निरोप ॥४५॥ कोपला तुजवरी ईश्वर । जाईल राज्यलक्ष्मी सर्व । वचनी ठेवी निर्धार । निरोप तुज दिला असे ॥४६॥ सिद्धवाक्य सत्य झाले । रावबाजीचे राज्य गेले । ब्रह्मावर्ती राहिले । परतंत्र जन्मभरी ॥४७॥ एके समयी अक्कलकोटी । दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी । तेव्हा बोलले स्वामी यती । आम्ही त्याते जाणतो ॥४८॥ यज्ञसमारंभाचे अवसरी । आम्ही होतो त्यांच्या घरी । तूप वाढण्याची कामगिरी । आम्हांकडे तै होती ॥४९॥ लीलाविग्रही श्रीस्वामी । जयांचे आगमन त्रिभुवनी । ते दीक्षितांच्या सदनी । असतील नवल नसेची ॥५०॥ महासिद्ध दीक्षित । त्यांचे वर्णिले अल्पवृत्त । मुरगोडी बाळाप्पा येत । पुण्यस्थान जाणोनी ॥५१॥ तिथे ऐकिला वृत्तान्त । अक्कलकोटी स्वामीसमर्थ । भक्तजन तारणार्थ । यतिरुपे प्रगटले ॥५२॥ अमृतासमान रसाळ कथा । ऐकता पावन श्रोता-वक्ता । करोनिया एकाग्र चित्ता । अवधान द्यावे श्रोते हो ॥५३॥ पुढले अध्यायी कथन । बाळाप्पा करील जप ध्यान । तयाची भक्ती देखोन । स्वामी कृपा करतील ॥५४॥ भक्तजनांची माउली । अक्कलकोटी प्रगटली । सदा कृपेची साउली । आम्हांवरी करो ते ॥५५॥ मागणे हेचि स्वामीप्रती । दृढ इच्छा माझे चित्ती । शंकराची प्रेमळ प्रीती । दास विष्णुवरी असो ते ॥५६॥ इति श्री स्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । सदा परिसोत प्रेमळ भक्त । दशमोऽध्याय गोड हा ॥५७॥

॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥

अध्याय ११
। श्री स्वामी चरित्र सारामृत एकादशोध्याय ।

॥ श्री गणेशाय नमः ॥ मागले अध्यायी वर्णिले । बाळाप्पा मुरगोडी आले । पुण्यस्थानी राहिले । तीन रात्री आनंदे ॥१॥ तेथे कळला वृतान्त । अक्कलकोटी साक्षात । यतिरुपे श्रीदत्त । वास्तव्य सांप्रत करिताती ॥२॥ तेथे आपुला मनोदय । सिद्धीस जाईल निःसंशय । फिटेल सर्वही संदेह । श्री सद़्गुरुकृपेने ॥३॥ परी मुरगोडीचे विप्र । बाळाप्पासी सांगत । गाणगापूर विख्यात । महाक्षेत्र भीमातीरी ॥४॥ तेथे आपण जावोनी । बैसावे हो अनुष्ठानी । श्रीगुरु स्वप्नी येवोनी । सांगती तैसे करावे ॥५॥ मानला तयासी विचार । निघाले तेथूनी सत्वर । जवळी केले गाणगापूर । परम पावन स्थान ते ॥६॥ कामना धरोनी चित्ती । सेवेकरी सेवा करिती । जेथे वाहे भीमा नदी । स्नान करिती भक्तजन ॥७॥ पुत्रकामना धरुनी चित्ती । आराधिती नृसिंहसरस्वती । दरिद्री धन इच्छिती । रोगीजन आरोग्य ॥८॥ कोणी घालिती प्रदक्षिणा । कोणी ब्राह्मणभोजना । कोणी करिती गंगास्नाना । कोणी घालिती नमस्कार ॥९॥ तेथील सर्व सेवेकरी । नित्य नियमे दोन प्रहरी । मागोनिया मधुकरी । निर्वाह करिती आपुला ॥१०॥ बाळाप्पा तेथे पातले । स्थान पाहोनी आनंदले । नृसिंहसरस्वती पाऊले । प्रेमभावे वंदिली ॥११॥ प्रातःकाळी उठोनी । संगमावरी स्नान करोनी । जप ध्यान आटपोनी । मागुनी येती गावात ॥१२॥ सेवेकऱ्यांबरोबरी । मागोनिया मधुकरी । भोजनोत्तर संगमावरी । परतोनि येती ते ॥१३॥ माध्यान्ह स्नान करोनी । पुन्हा बैसली जप ध्यानी । अस्ता जाता वासरमणी । संध्यास्नान करावे ॥१४॥ करोनिया संध्यावंदन । जप आणि नामस्मरण । रात्र पडता परतोन । ग्रामामाजी येती ते ॥१५॥ बाळाप्पा ते गृहस्थाश्रमी । संतती संपत्ती सर्व सदनी । परान्न ठावे नसे स्वप्नी । सांप्रत भिक्षा मागती ॥१६॥ सद़्गुरुप्राप्तीकरिता । सोडूनी गृह-सुत-कांता । शीतोष्णाची पर्वा न करिता । आनंदवृत्ती राहती ॥१७॥ पंचपक्वान्ने सेविती घरी । येथे मागती मधुकरी । मिळती कोरड्या भाकरी । उदर पूर्ती न होय ॥१८॥ शीतोष्णाचा होय त्रास । अर्धपोटी उपवास । परी तयांचे मानस । कदा उदास नोहेची ॥१९॥ अय्याराम सेवेकरी । राहत होते गाणगापुरी । त्यांनी देखुनी ऐसीपरी । बाळाप्पासी बोलती ॥२०॥ तुम्ही भिक्षा घेवोनी । नित्य यावे आमुच्या सदनी । जे जे पडेल तुम्हांस कमी । ते ते आम्ही पुरवू जी ॥२१॥ बाळाप्पासी मानवले । दोन दिवस तैसे केले । पोटभरोनी जेवले । परी संकोच मानसी ॥२२॥ जाणे सोडिले त्यांचे घरी । मागोनिया मधुकरी । जावोनिया संगमावरी । झोळी उदकी बुडवावी ॥२३॥ आणोनिया बाहेरी । बैसोनी तिथे शिळेवरी । मग खाव्या भाकरी । ऐसा नेम चालविला ॥२४॥ ऐसे लोटले काही दिवस । सर्व शरीर झाले कृश । निशिदीनी चिंता चित्तास । सद़्गुरुप्राप्तीची लागली ॥२५॥ घरदार सोडिले । वनिता पुत्रा त्यागिले । अतितर कष्ट सोशिले । सद़्गुरुकृपा नोहेची ॥२६॥ हीन आपुले प्राक्तन । भोग भोगवी दारुण । पहावे सद़्गुरुचरण । ऐसे पुण्य नसेची ॥२७॥ ऐसे विचार निशिदीनी । येती बाळाप्पाचे मनी । तथापि कष्ट सोसोनी । नित्य नेम चालविला ॥२८॥ एक मास होता निश्चिती । स्वप्नी तीन यतिमूर्ती । येवोनिया दर्शन देती । बाळाप्पा चित्ती सुखावे ॥२९॥ पंधरा दिवस गेल्यावरी । निद्रिस्त असता एके रात्री । एक ब्राह्मण स्वप्नाभीतरी । येवोनिया आज्ञापी ॥३०॥ अक्कलकोटी श्रीदत्त । स्वामीरुपे नांदत । तेथे जाऊनी त्वरित । कार्य इच्छित साधावे ॥३१॥ पाहोनिया ऐसे स्वप्न । मनी पावले समाधान । म्हणती केले कष्ट दारुण । त्याचे फळ मिळेल की ॥३२॥ अक्कलकोटी त्वरीत । जावयाचा विचार करीत । तव तयासी एक पत्र । शय्येखाली सापडले ॥३३॥ त्यात लिहिली एक ओळी । करु नये उतावळी । ऐसे पाहूनी त्या वेळी । विचार केला मानसी ॥३४॥ आपण केले अनुष्ठान । परी ते जाहले अपूर्ण । आणखीही काही दिन । क्रम आपुला चालवावा ॥३५॥ मग कोणे एके दिवशी । बाळाप्पा आले संगमासी । वृक्षातळी ठेवून वस्त्रासी । गेले स्नान करावया ॥३६॥ परतले स्नान करोनि । सत्वर आले त्या स्थानी । वस्त्र उचलिता खालोनी । वृश्चिक एक निघाला ॥३७॥ तयासी त्यांनी न मारिले । नित्यकर्म आटोपिले । ग्रामामाजी परत आले । गेले भिक्षेकारणे ॥३८॥ त्या दिवशी ग्रामाभीतरी । पक्वान्न मिळाले घरोघरी । बाळाप्पा तोषले अंतरी । उत्तम दिन मानिला ॥३९॥ अक्कलकोटी जावयासी । निघाले मग त्याच दिवशी । उत्तम शकुन तयांसी । मार्गावरी जाहले ॥४०॥ चरण-चाली चालोनी । अक्कलकोटी दुसरे दिनी । बाळाप्पा पोचले येवोनी । नगरी रम्य देखिली ॥४१॥ जेथे नृसिंहसरस्वती । यतिरुपे वास करिती । तेथे सर्व सौख्ये नांदती । आनंद भरला सर्वत्र ॥४२॥ तया नगरीच्या नारी । कामधंदा करिता घरी । गीत गाउनी परोपरी । स्वामीमहिमा वर्णिती ॥४३॥ दूर देशीचे ब्राह्मण । वैश्यादिक इतर वर्ण । स्वामीमहिमा ऐकोन । दर्शनाते धावती ॥४४॥ तयांची जाहली गर्दी । यात्रा उतरे घरोघरी । नामघोषे ते नगरी । रात्रंदिन गजबजे ॥४५॥ राजे आणि पंडित । शास्त्री वेदांती येत । तैसे भिक्षुक गृहस्थ । स्वामीदर्शनाकारणे ॥४६॥ कानफाटे नाथपंथी । संन्यासी फकीर यती । रामदासी अघोरपंथी । दर्शना येती स्वामींच्या ॥४७॥ कोणी करिती कीर्तन । गायन आणि वादन । कोणी भजनी नाचोन । स्वामीमहिमा वर्णिती ॥४८॥ तया क्षेत्रीच महिमान । केवी वर्णू मी अज्ञान । प्रत्यक्ष जे वैकुंठभुवन । स्वामीकृपेने जाहले ॥४९॥ पुण्यपावन देखोन नगरी । बाळाप्पा तोषले अंतरी । पूर्वपुण्य तयांचे पदरी । जन्मसार्थक जाहले ॥५०॥ बाळाप्पा होउनी सेवेकरी । स्वहस्ते करील श्रीचाकरी । ती मधुर कथा चतुरी । पुढील अध्यायी परिसावी ॥५१॥ जयाचा महिमा अगाध । जो केवळ सच्चिदानंद । विष्णूशंकरी अभेद । मित्रत्व ठेवो जन्मवरी ॥५२॥ इति श्री स्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । श्रोते सदा परिसोत । एकादशोऽध्याय गोड हा ॥५३॥

॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥

अध्याय १२
। श्री स्वामी चरित्र सारामृत द्वादशोध्याय ।

॥ श्री गणेशाय नमः ॥ करावया जगदुद्धार । हरावया भूभार । वारंवार परमेश्वर । नाना अवतार धरितसे ॥१॥ भक्तजन तारणार्थ । अक्कलकोटी श्रीदत्त । यतिरुपे प्रगट होत । तेची समर्थ श्रीस्वामी ॥२॥ गताध्यायाचे अंती । बाळाप्पा आले अक्कलकोटी । पुण्यनगर पाहोनी दृष्टी । आनंद पोटी नच मावे ॥३॥ त्या दिवशी श्री समर्थ । होते खासबागेत । यात्रा आली बहुत । गर्दी झाली श्रींजवळी ॥४॥ बाळाप्पाचे मानसी । तेव्ही चिंता पडली ऐशी । ऐशा गर्दीत आपणासी । दर्शन कैसे होईल ॥५॥ परी दर्शन घेतल्याविण । आज करु नये भोजन । बाळाप्पाचे तनमन । स्वामीचरणी लागले ॥६॥ दर्शनेच्छा उत्कट चित्ती । खडीसाखर घेवोनी हाती । गर्दीमाजी प्रवेश करिती । स्वामी सान्निध पातले ॥७॥ आजानुबाहू सुहास्यवदन । श्रीस्वामीमूर्ती पाहोन । बाळाप्पाने धावोन । दृढ चरण धरियेले ॥८॥ कंठ सद़्गदित जाहला । चरणी भाळ ठेविला । क्षणैक मीपण विसरला । परम तोषला मानसी ॥९॥ गंगा मिनली सागरी । जैसे तरंग जलाभीतरी । तैसे बाळाप्पा ते अवसरी । स्वामीचरणी दृढ झाले ॥१०॥ मधुस्तव भ्रमर जैसा । कमलपुष्प न सोडी सहसा । स्वामीचरणी बाळाप्पा तैसा । दृढ जडला स्वभावे ॥११॥ येवोनिया भानावरती । श्रीचरणांची सोडिली मिठी । ब्रह्मानंद न मावे पोटी । स्तोत्र ओठी गातसे ॥१२॥ श्री स्वामी समर्थ त्या वेळी । पडले होते भूतळी । उठोनिया काय केली । लीला एक विचित्र ॥१३॥ सर्व वृक्षांसी आलिंगन । दिले त्यांनी प्रेमेकरोन । बाळाप्पावरचे प्रेम । ऐशी कृतीने दाविले ॥१४॥ धन्यता मानोनी मनी । बाळाप्पा निघाले तेथोनी । परी तयांचे श्रीचरणी । चित्त गुंतले अखंड ॥१५॥ त्यासवे एक जहागिरदार । ते होते बिऱ्हाडावर । स्वयंपाक करोनी तयार । म्हणती जाऊ दर्शना ॥१६॥ बाळाप्पा दर्शन करोन । आले बिऱ्हाडी परतोन । जहागिरदारे नैवेद्य काढोन । बाळाप्पा हाती दिधला ॥१७॥ म्हणती जाउनी स्वामींसी । अर्पण करा नैवेद्यासी । अवश्य म्हणोनी तयांसी । बाळाप्पा तेव्हा चालले ॥१८॥ म्हणती नैवेद्य दाखवून । मग करु प्रसाद भक्षण । मार्गी तयांसी वर्तमान । विदीत एक जाहले ॥१९॥ या समयी श्री समर्थ । असती नृप मंदिरात । राजाज्ञेवाचूनी तेथ । प्रवेश कोणाचा न होय ॥२०॥ ऐसे ऐकूनी वर्तमान । बाळाप्पा मनी झाले खिन्न । म्हणती आज नैवेद्यार्पण । आपल्या हस्ते नोहेची ॥२१॥ मार्गावरुनी परतले । सत्वर बिऱ्हाडावरती आले । तेथे नैवेद्यार्पण केले । मग सारिले भोजन ॥२२॥ नित्य प्रातःकाळी उठोन । षट्कर्मांते आचरोन । घेवोनी स्वामी दर्शन । जपालागी बैसावे ॥२३॥ श्री शंकर उपास्य दैवत । त्याचे करावे पूजन नित्य । माध्यान्ही येता आदित्य । जपानुष्ठान आटपावे ॥२४॥ करी झोळी घेवोनी । श्री स्वामींजवळी येवोन । मस्तक ठेवोनी चरणी । जावे भिक्षेकारणे ॥२५॥ मागोनिया मधुकरी । मग यावे बिऱ्हाडावरी । जी मिळेल भाजीभाकरी । त्याने पोट भरावे ॥२६॥ घ्यावे स्वामी दर्शन । मग करावे अनुष्ठान । ऐशा प्रकारे करोन । अक्कलकोटी राहिले ॥२७॥ चोळाप्पा आदीकरोन । सेवेकरी बहुतजण । त्यांत सुंदराबाई म्हणून । मुख्य होती त्या वेळी ॥२८॥ आपण व्हावे सेवेकरी । इच्छा बाळाप्पाचे अंतरी । सुंदराबाईचिये करी । आधिपत्य सर्व असे ॥२९॥ एके दिवशी तयासी । बाई आज्ञा करी ऐशी । आपणही श्रीसेवेसी । करीत जावे आनंदे ॥३०॥ बाळाप्पा मनी आनंदला । म्हणे सुदिन आज उगवला । सद़्गुरुसेवेचा लाभ झाला । जाहले सार्थक जन्माचे ॥३१॥ बहुत जण सेवेकरी । बाई मुख्य त्यांमाझारी । सर्व अधिकार तिच्या करी । व्यवस्थेचा होता पै ॥३२॥ मी प्रिय बहु स्वामींसी । ऐसा अभिमान तियेसी । गर्वभरे इतरांसी । तुच्छ मानू लागली ॥३३॥ या कारणे आपसात । भांडणे होती सदोदित । स्वामीसेवेची तेथ । अव्यवस्था होतसे ॥३४॥ हे बाळाप्पांनी पाहोन । नाना युक्ती योजून । मोडुनि टाकिले भांडण । एकचित्त सर्व केले ॥३५॥ कोठेही असता समर्थ । पूजादिक व्हावया यथार्थ । तत्संबंधी सर्व साहित्य । बाळाप्पा सिद्ध ठेविती ॥३६॥ समर्थांच्या येता चित्ती । अरण्यांतही वस्ती करिती । परी तेथेही पूजा आरती । नियमे करिती बाळाप्पा ॥३७॥ बाळाप्पांची प्रेमळ भक्ती । पाहुनी संतोष स्वामीप्रती । दृढ भाव धरुनी चित्ती । सेवा करिती आनंदे ॥३८॥ ऐसे लोटता काही दिवस । बाळाप्पाचिया शरीरास । व्याधी जडली रात्रंदिवस । चैन नसे क्षणभरी ॥३९॥ बेंबीमधूनिया रक्त । वहातसे दिवसरात्र । तया दुःखे विव्हळ होत । म्हणती कैसे करावे ॥४०॥ भोग भोगिला काही दिन । कागदाची पुडी बेंबीतून । पडली ती पाहता उकलोन । विष त्यात निघाले ॥४१॥ पूर्वी कोण्या कृतघ्ने । बाळाप्पासी यावे मरण । विष दिधले कानोल्यातून । पडले आज बाहेर ॥४२॥ स्वामीकृपेने आजवरी । गुप्त राहिले होते उदरी । सद़्गुरुसेवा त्यांचे करी । व्हावी लिखित विधीचे ॥४३॥ आजवरी बहुतापरी । बाळाप्पा करी चाकरी । तयाचे अंतर परी । स्वामीमय न जाहले ॥४४॥ प्रत्येक सोमवारी तयांनी । महादेवांची पूजा करोनी । मग यावे परतोनी । स्वामीसेवेकारणे ॥४५॥ हे पाहोनी एके दिवशी । बाई विनवी समर्थांसी । आपण सांगुनी बाळाप्पासी । शंकरपूजनी वर्जावे ॥४६॥ तैशी आज्ञा तयाप्रती । एके दिनी समर्थ करिती । परी बाळाप्पाचे चित्ती । विश्वास काही पटेना ॥४७॥ बाईच्या आग्रहावरुन समर्थे दिली आज्ञा जाण । हे नसेल सत्य पूर्ण । विनोद केला निश्चये ॥४८॥ पूजा करणे उचित । न करावी हेचि सत्य । यापरी चिठ्ठ्या लिहित । प्रश्न पाहत बाळाप्पा ॥४९॥ एक चिठ्ठी तयातून । उचलुनी पाहता वाचून । न करावेची पूजन । तयामाजी लिहिलेसे ॥५०॥ तेव्हा सर्व भ्रांती फिटली । स्वामी आज्ञा सत्य मानिली । ही भानगड पाहिली । श्रीपाद भटजीने ॥५१॥ समर्थांचा पूर्ण भक्त । चोळाप्पा नामे विख्यात । तयाचा हा जामात । श्रापादभट्ट जाणिजे ॥५२॥ स्वामीपुढे भक्तजन । ठेविती द्रव्यादिक आणोन । ते सुंदराबाई उचलोन । नेत असे सत्वर ॥५३॥ त्यामुळे चोळप्पाप्रती । अल्प होई द्रव्यप्राप्ती । बाळाप्पामुळे म्हणती । नुकसान होते आपुले ॥५४॥ तेव्हा जामात श्वशुर । उभयतां करिती विचार । बाळाप्पाते आता दूर । केले पाहिजे युक्तीने ॥५५॥ श्रीपादभट्ट एके दिवशी । काय बोलती बाळाप्पासी । दारापुत्र सोडुनी देशी । आपण येथे राहिला ॥५६॥ आपण आल्यापासोन । आमुचे होते नुकसान । ऐसे बोल ऐकोन । बाळाप्पा मनी खिन्न झाला ॥५७॥ बाळाप्पा बोले वचन । तुमचे अन्न खावोन । करितो तुमचे नुकसान । व्यर्थ माझा जन्म हा ॥५८॥ स्वामींनी मज आज्ञा द्यावी । मी जातो आपुल्या गावी । परी तुम्ही युक्ती योजावी । आज्ञा होईल ऐशीच ॥५९॥ श्रीपादभट्टे एके दिवशी । विचारले समर्थांसी । कुलदेवतेच्या दर्शनासी । जावया इच्छी बाळाप्पा ॥६०॥ ऐसे ऐकुनिया समर्थ । हास्यमुखे काय बोलत । कुलदेवतेचे दर्शननित्य । बाळाप्पा येथे करीत असे ॥६१॥ तेव्हा निरुत्तर जाहला । ऐसा उपाय खुंटला । मग तयाने पाहिला । कारभार चिठ्ठ्यांचा ॥६२॥ तयाने पुसिले वर्तमान । बाळाप्पा सांगे संपूर्ण । श्रीपादभट्टे ऐकोन । कापट्य मनी आणिले ॥६३॥ म्हणे जावया आपणासी । समर्थ न देती आज्ञेसी । तरी टाकून चिठ्ठ्यांसी । आज्ञा घ्यावी आपण ॥६४॥ तयांचे कपट न जाणोनी । अवश्य म्हणे त्याच दिनी । दोन चिठ्ठ्या लिहोनी । उभयतांसी टाकिल्या ॥६५॥ चिठ्ठी आपुल्या करी । भटजी उचली सत्वरी । येथे राहूनी चाकरी । करी ऐसे लिहिलेसे ॥६६॥ भटजी मनी खिन्न झाला । सर्व उपाय खुंटला । महाराज आता बाळाप्पाला । न सोडतील निश्चये ॥६७॥ स्वामी चरणी दृढ भक्ती । बाळाप्पाची जडली होती । कैसा दूर तयाप्रती । करितील यती दयाळ ॥६८॥ जो केवळ दयाधन । भक्तकाजकल्पद्रुम । विष्णू शंकर दोघेजण । तयांसी शरण सदैव ॥६९॥ इति श्री स्वामी चरित्र । नाना प्राकृत कथा संमत । सदा प्रेमळ परिसोत । द्वादशोऽध्याय गोड हा ॥७०॥

॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥