बुधवार, २३ डिसेंबर, २०१५

अशफ़ाक़उल्ला खान

      खुदा का सच्चा बंदा : अशफ़ाक़उल्ला खान

             तीसचं दशक हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील अत्यंत धामधुमीचं दशक. गांधीजीं सविनय कायदेभंगाच्या तयारीत व्यस्त होते, तर नुसत्या अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळणं अशक्य आहे, अशी विचारधारा असलेला तरुण वर्ग, सशस्र क्रांतीकडे आकर्षित होऊ लागला होता.

             अहिंसक आंदोलनात हिरीरीने भाग घेणारा मुस्लिम तरुण मात्र, सशस्र क्रांतीपासून चार हात दूरच होते. नेमकी हीच गोष्ट मुस्लिम विरोधकांना, मुस्लिमांच्या मर्मावर बोट ठेवण्यासाठी पुरेशी होती.

             काकोरी कटाचे मुख्य सूत्रधार थोर क्रांतिकारक रामप्रसाद 'बिस्मिल' हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे कट्टर समर्थक होते. मुस्लिम समाजाच्या देशभक्तीविषयी घेतल्या जाणा-या शंकेमुळे, त्यांना असह्य वेदना होत. परिणामी सशस्त्र क्रांतीकडे मुस्लिम तरुणांचं मन वळवण्यासाठी ते प्रयत्नशील होते. या प्रयत्नात त्यांना गवसलेलं अमूल्य रत्न म्हणजे, अशफ़ाक़ उल्ला खान !

             अशफाक़ उल्ला खान म्हणजे रामप्रसाद 'बिस्मिल' यांचा उजवा हातच! रामप्रसादांच्या खांद्याला खांदा लावून ते काकोरी कटात सहभागी झाले. या कटातील सहभागामुळे रामप्रसाद 'बिस्मिल', अशफाक उल्ला खान, राजेंद्रनाथ लाहिरी आणि ठाकूर रोशनसिंह या चौघा क्रातीविरांना फाशीची शिक्षा झाली. १९ डिसेंबर १९२७ रोजी त्यांना फाशी देण्यात आले.

             पवित्र कुराणाची प्रत काखेत घेऊन एखाद्या हज यात्रेकरुच्या थाटात अशफ़ाक उल्ला खान फाशीच्या तख्ताच्या दिशेने मोठ्या रुबाबात चालत गेले. फासाचे चुंबन घेऊन त्यांनी अल्लाची प्रार्थना केली. हिंदू - मुस्लिमांना एकजूटीने स्वातंत्र्यलढा लढण्याचं अपिल केलं. आणि देशातल्या सात कोटी मुसलमानांपैकी मी पहिला मुसलमान आहे, जो देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावर चढत आहे, अशी कृतार्थता व्यक्त करून ते फाशी गेले. त्यांचा मृतदेह मालगाडीच्या डब्यातून शाहजहाँपूर या त्यांच्या गावी नेण्यात आला. दहा तासांनंतरही त्यांच्या चेह-यावरचं तेज नि प्रसन्नता लोप पावली नव्हती.

             रामप्रसादांचं हिंदू-मुस्लिम ऐक्याचं स्वप्न साकार झालं होतं. फासावर जाण्यापूर्वी ते म्हणाले होते- "अशफाक ! तू माझी आणि देशातील सर्व मुसलमानांची लाज राखली. हिंदू युवकांप्रमाणे मुस्लिम युवकही  देशासाठी हिरीरीने प्राणार्पण करू शकतो हे मला दाखवून द्यायचं होतं. मुसलमानांवर विश्वास टाकता येणार नाही असं म्हणण्याचं आता, कुणालाही धाडस होणार नाही."

             कूटनीतिचा भाग म्हणून रामप्रसाद यांनी अशफ़ाक उल्ला खान यांना प्रिव्ही कौंसीलकडे माफीनामा देण्यास सांगितले होते. त्याला ते अजिबात तयार नव्हते. रामप्रसादांच्या इच्छेखातर त्यांनी तो दिला पण अतिशय बाणेदारपणे ते म्हणाले होते, "बंदा खुदा के सीवा किसीसे माफी मांगना हराम समझता है." प्रिव्ही कौंसीलने तो माफीनामा फेटाळल्यामुळे, कूटनीति तर सफल झाली नाही, पण अशफाक उल्ला खान यांचं, आपण ईमान पणाला लावलं, याचं शल्य मात्र रामप्रसाद 'बिस्मिल' यांना अखेर पर्यंत बोचत राहिलं.

             हिंदू-मुस्लिम क्रांतीविरांची ही जोडी हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतीक बनून अजरामर झाली. काकोरी कटातील हुतात्म्यांना  त्यांच्या स्मृतींना सैनिक दर्पणचा कोटी कोटी प्रणाम !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा