"परांजप्या, तुला सांगतो आताशा मी दिवसेंदिवस थक्क आणि हताश होत चाललो आहे तुमच्या पिढीची अवस्था बघुन.
अरे, दहातल्या पाचांना पस्तिशीनंतर ब्लडप्रेशर आणि दहातल्या पाचांना चाळीशीनंतर डायाबिटिस?
अरे काय रे ही अवस्था
भयंकर....अतिभयंकर.
तुला सांगतो काशीविश्वेश्वराच्या कृपेने आणि माझ्या अक्कलहुशारीने मला आज ऐंशीव्या वर्षीही हे दोन्ही रोग नाहीत. इतकंच काय दमा सोड साधा सर्दीखोकलाही नाही.
ही आमच्या आयुर्वेदाची कृपा बरं का, आणि वंशपरंपरागत चालंत आलेलं जोश्यांचं आहारशास्त्र.
आमचे पिताश्री आणि काका नव्वदी गाठून मगच कैलास पर्वत गाठायला गेले यामागचं रहस्य हेच आहे. तुला काही गोष्टी सांगतो त्या नीट लक्षात घे. आणि वागायचा प्रयत्न कर बाबा....
सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आमच्या आहारात लहानपणापासुन मैदा, मीठ आणि साखर या तीन पांढऱ्या विषांना अगदी कमी वाव होता. आजही मी हे तीन पदार्थ होता होईतोवर खाणं टाळतो.
मैदा या पदार्थाची गरज शरीराला अजिबात नाही हे माझं ठाम मत आहे. त्यापरिस आपलं गव्हाचं पीठ आणि रवा केव्हाही उत्तम.
मीठ आणि साखर अगदी माफक खावं माणसाने. आजकालची तुमची हाटेलात खायची सवय आम्हाला कधीही नव्हती. आम्ही वर्षातून कधी एखादवेळा मित्रासोबत मिसळ खायला गेलो तर जायचो, अन्यथा हाटॆलात पायही ठेवत नसायचो आम्ही.
तुला सांगतो हाटेलात बनवलेल्या पदार्थात अनावश्यक आणि अतोनात मीठ वापरतात, मसाल्यांचा अतिरेक असतो. चटपटीत पदार्थांचा आस्वाद घेताना आपण किती जास्त मीठ खातोय हे लक्षातही येत नाही तुमच्या आणि अतीखारटपणाने मुत्रपिंडांवर ताण येतो, आणि ब्लडप्रेशर अलगद प्रवेश करते.
अगदी तसंच साखरेचं आहे. सकाळी चहात अर्धापाव चमचा साखर गेली की संपलं, तिची भेट डायरेक्ट दुपारच्या चहाला, ती देखील पुन्हा अर्धापाव चमच्यापुरतीच रे.
आजकालच्या सारख्या मिठाया नी चाकलेटं आमच्यावेळी नव्हती. अगदीच आठवड्यातून एखादवेळी गोडाची इच्छा झालीच तर तुपगुळ आणि पोळी बेश्ट...
आजकाल बाजारात उठल्यासुठल्या मिळणाऱ्या मिठाया खाणं सर्वप्रथम बंद करा. मिठाई ही ऋतुमानानुसार खावी आणि ती देखील मर्यादित असावी. तुम्ही पोरांच्या नादी लागून वाट्टॆल तशी मिठाई खरेदी करता....
का तर म्हणे आमच्या पिंट्यला गोडाची आवड आहे म्हणून?
अरे छे छे....
तसं करु नका. आणि तुला सांगतो मनापासुन, मला आजकालच्या त्या नव्या बंगाली मिठाया आणि रंगीत मिठाया बघितल्या की छातीत धडकीच भरते.
बंगाली आणि पंजाबी किंवा दिल्लीकडच्या मिठाया या त्यांच्या हवामानाला पोषक असतील रे...
हौस म्हणुन कधीतरी चाखायला हरकत नाही. पण उठल्यासुठल्या बंगाली रसगुल्ले खायला लागलास तर ते तुझ्या कोकणी पोटाला कसं मानवेल बाबा??
आमच्या लहानपणी मैद्याचा वापर हे दिवाळीच्या करंज्यांपुरता आई करायची, नंतर पुन्हा वर्षभर मैदा नजरेसही पडायचा नाही.
आजकाल तुमची पिढी उठल्यासुठल्या पंजाबी हाटेलात जाऊन तंदुर रोटी म्हणुन वारेमाप मैदा खाते. ब्रेड, पाव, बटर, केक आणि बिस्किटांशिवाय तुमचं पानही हलत नाही. सकाळी चहात बिस्किटे बूडवून खाणं बंद कर. आणि नाष्त्याला पाव-बटर-ब्रेड साफ बंद कर, त्याऐवजी आपले पोहे, उपमा, शिरा,मेतकुट-भात केव्हाही बेस्ट रे.
अरे तुमचं चुकतं काय माहितीये लेको? पदार्थ आवडला की तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारात त्याचा समावेश करुन मोकळे होता. पण तो पदार्थ जिथे बनतो तिथलं हवामान, तिथल्या लोकांचं रहाणीमान, त्यांचा वंश यांचा विचार करुन तो तिथे बनवला जातो.
पंजाबातल्या रांगड्या हवामानात कदाचित मैदा पचत असावा, इथे तुम्ही रोट्या खाता आणि खुर्चीवर ** टेकून काम्प्युटरवर काम करता. तुम्हाला लेको कसा पचायचा रे मैदा?
जिथे रहातोस त्या प्रांतात आजवर जे पिकत आलंय आणि जे शिजत आलंय तेच खावं माणसाने. मी श्टॅंपपेपरवर लिहून देतो असले श्रीमंती **** आजार होणार नाहीत तुला...."
-बंडोपंत विष्णुपंत जोशी
उर्फ बंडाकाका
निवृत्त सरकारी कर्मचारी
लोकोत्तर पुरुष रहातात ती
जगप्रसिध्द मधली आळी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा